श्री
जेठालाल शाह हे मी सचिवालयामध्ये (मंत्रालय हा शब्द नंतरच्या काळातला!) मी काम
करीत होतो, तेव्हांचे माझे सहकारी. सचिवालयांत मी सहाव्या माळ्यावर तत्कालीन मुख्यमंत्री
स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रसिद्धीचे काम पहायचो. त्यामुळे तळमजल्यावरील प्रसिद्धी
संचालनत्यांतील अधिकाऱ्यांचा दैनंदिन संबंध येत नसे. परंतु वसंत देशमुख, वसंत सबनीस आणि वसंत शिरवाडकर या तीन वसंतांबरोबर माझी मैत्री जुळली
होती. साहित्य हा आमच्यातील समान दुवा. त्यामध्ये जेठालाल शाह या तरूण मित्राचा
लवकरच समावेश झाला. तो त्यांच्या साहित्यलेखनामुळे नव्हे तर साहित्यप्रेमामुळे आणि
अत्यंत ऋजु, सुसंस्कृत, स्नेहशील
स्वभावामुळे.
कार्यालयांतील मैत्री
कार्यालय संपले की संपते. माझ्याकडून अनेकांच्या बाबतीत तेच घडले. पण जेठालाल
यांना मी विसरलो नव्हतो. मात्र कामांच्या विविध व्यापामध्ये जेठालाल यांनी भेट होत
नव्हती. अखेरीस आपले हे छोटेसे आत्मकथन घेऊन तेच माझ्या भेटीला आले आणि
पुनर्भेटीचा दुर्मिळ आनंद मी अनुभवला.
जेठालाल शाह यांच्या
स्वभावांतील सद्गुण मला जे जाणवले त्यामागील पार्श्वभूमी हे पुस्तक वाचतांना
लक्षांत येते. सुखद् कुटुंबात जन्म. अहमदनगरसारख्या मुंबईहून दूर असलेल्या
परिसरांत त्यांचे बालपण गेले व 'करीयर'साठी ते मुंबईला आले.
मुंबईच्या मायानगरीमध्ये त्यांना योगायोगाने उत्तम मित्रमंडळी लाभली. सर्वजण
साहित्य-संगीत-नाट्य या कलाजगतांतील. त्यांच्या सहवासांत मैत्रीमुळे जेठालाल शाह
यांचे व्यक्तिमत विकसित झाले. पत्रकारिकेत आले. त्यानंतर सचिवालयातील शासकीय
नोकरीतील अनेकविध अनुभवांमुळे ते संपन्न झाले. आतां जेठालाल शाह हे निवृत्त होऊन,
शांतपणे जीवन व्यतीत करीत आहेत. निवृत्तीमध्येही आपली जन्मजात
प्रवृत्ती टिकवून आहेत. मनाची आणि शरीराची निकोपता जपून आहेत.. कारण मुळांत
त्यांची दृष्टि सकारात्मक आहे. निगेटिव्ह विचार त्यांच्यापाशी फिरकले नाहीत.
विद्यार्थी दशेतील, राष्ट्र वादलांतील सुसंस्कार, देशभक्ती,
मातापित्यांचे, देशाचे प्रेम यांचे जेठालाल
यांना लाभलेले पाथेय आयुष्यभर पुरणारे आहे व त्यातच त्यांच्या जीवनाचे प्रेम व
श्रेय समावलेले आहे. त्यांचे हे आत्मकथन त्यांच्या प्रांजळपणामुळे आवडले.
मित्रवर्य श्री जेठालाल शाह यांना भावी वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.
-
मधु मंगेश कर्णिक
मुंबई
५३
१५/२/२०११